{"product_id":"aarogyadayi-ranbhajya-healthy-wild-vegetables-dr-madhukar-bachulkar","title":"आरोग्यदायी रानभाज्या | Healthy Wild Vegetables | Dr Madhukar Bachulkar","description":"\u003ch5\u003eमनोगत\u003c\/h5\u003e\n\u003cp\u003eअन्न, वस्त्र, निवारा तसेच आरोग्यादायी पर्यावरण या प्रमुख मूलभूत गरजांसाठी मानव संपूर्णतः वनस्पतीसंपदेवर अवलंबून आहे. मानवाच्या आहारात प्रामुख्याने, वनस्पतींपासून मिळणाऱ्या भाज्या, फळे, धान्य, कडधान्य हे मुख्य घटक असतात. वनस्पतीच्या विविध भागांचा आहारात भाजी म्हणून वापर केला जातो. मानवाच्या आहारात असणाऱ्या बहुतांश वनस्पतींची शेतात लागवड केली जाते. जंगलात आढळणाऱ्या अनेक वनस्पतीही मानवी आहाराचा भाग असतात. तसेच, शेतात, बागेत, ओसाड जमिनीवर, रस्त्यांच्या कडेने, परसदरी अनेक प्रकारची तणे, कंद, भाज्या, फळे ऋतुनुसार आपसूक वाढतात. काहींची आता लागवडही केली जाते. अशा 'रानभाज्यां'बाबतची पारंपारिक माहिती खेड्यांत, वनांत राहणाऱ्या, ग्रामीण, आदिवासी स्त्री-पुरुषांना असते. ते पारंपारिक पद्धतीने रानभाज्यांचा आपल्या आहारात सर्रास वापरही करतात. रानभाज्यांचे औषधी गुणधर्मही त्यांना माहिती असतात.\u003cbr\u003e'निसर्ग मित्र, कोल्हापूर' या सेवाभावी संस्थेच्या वतीने कोल्हापूर जिल्ह्यातील विविध ठिकाणी, २०१० मध्ये, आंतरराष्ट्रीय जैवविविधता वर्षानिमित्त रानभाज्यांच्या पाककृतींच्या स्पर्धा आयोजित केल्या होत्या. एक नवीन उपक्रम म्हणून, ग्रामीण आणि शहरी भागात, याला मोठा प्रतिसाद मिळाला. रानभाज्यांचे, रानभाज्यांच्या विविध पाककृतींचे, रानभाज्यांपासून बनवण्यात आलेल्या विविध पदार्थांचे प्रदर्शन भरवण्यात आले. प्रथम तीन क्रमांकाच्या विजेत्यांचा पारितोषिके देऊन सत्कार करण्यात आला.\u003cbr\u003eरानभाज्यांच्या या स्पर्धेतून आम्हास ज्ञात झालेल्या सर्व माहितीचे आम्ही संकलन केले. विविध रानभाज्यांचा वनस्पतीशास्त्रानुसार अभ्यास केला. कोल्हापुरातील आयुर्वेद वैद्य डॉ. अशोक वाली व डॉ. हरिश नांगरे यांच्या सहकार्याने रानभाज्यांच्या औषधी गुणधर्मांची, औषधी उपयोगांची उपयुक्त माहिती संकलित केली. रानभाज्यांची पोस्टर्स तयार करून, विविध उपक्रम व कार्यक्रमांतून रानभाज्या आणि त्यांच्या उपयुक्ततेबाबत जनजागृती केली. रानभाज्यांची शास्त्रीय ओळख, त्यांचा आहारातील उपयोग, औषधी गुणधर्म व वापर अशी सर्वंकष माहिती देणाऱ्या 'रानभाज्यांची ओळख' या आमच्या उपक्रमाला भरपूर प्रसिद्धी मिळाली. या विषयावरील शोधनिबंधही डॉ. सर्जेराव साळुंखे (माजी विभागप्रमुख, समाजशास्त्र विभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर) व मी (अध्यक्ष, निसर्ग मित्र, कोल्हापूर) यांनी कर्नाटक विद्यापीठ, धारवाड येथील राज्यस्तरीय पातळीवरील परिषदेमध्ये सादर केला व रिसर्च जर्नलमध्ये प्रसिद्ध केला.\u003cbr\u003eया उपक्रमातून आम्हास आजरा, चंदगड, गडहिंग्लज, कागल, शाहूवाडी, गगनबावडा, राधानगरी, भुदरगड इत्यादी तालुक्यातील ज्येष्ठ महिलांकडून अत्यंत उपयुक्त माहिती मिळाली. अशी सर्व माध्यमातून गोळा होणारी रानभाज्यांची माहिती संकलित करून ती, 'ओळख रानभाज्यांची' या पुस्तकाच्या रूपात ऑक्टोबर, २०१२ मध्ये वन्यजीव सप्ताहात प्रसिद्ध केली. या पुस्तकास वाचकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला. सर्वात विशेष बाब म्हणजे कोल्हापूर शहरातील काही हॉटेल्समध्ये 'केना' या रानभाजीच्या पानांपासून तयार केली जाणारी भजी ग्राहकांना मिळू लागली आहे. सभोवतालच्या वनस्पती विविधतेची माहिती मिळाल्यास, त्याचा कसा वापर केला जाऊ शकतो, याचे उत्तम उदाहरण निसर्ग मित्र संस्थेने जनतेसमोर ठेवले आहे.\u003cbr\u003eधुळे जिल्ह्यातील 'बारीपाडा' या लहानशा आदिवासी गावात, गेली अनेक वर्षे दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात 'रानभाज्या महोत्सव' घेतला जातो. हा महोत्सव पाहण्यासाठी व रानभाज्यांचा आस्वाद घेण्यासाठी, महाराष्ट्रातील विविध भागांतून अनेक जण दरवर्षी बारीपाड्याला भेट देतात. विशेष महत्त्वाचे म्हणजे, बारीपाडा येथील गावकऱ्यांनी गावात जैवविविधता मंडळाची स्थापना करून परिसरातील जैवविविधता संरक्षण - संवर्धन सुरू केले आहे. हा आदर्श प्रत्येक गावाने, शहराने घेणे आवश्यक आहे, तरच आपली समृद्ध जैवविविधता टिकून राहू शकेल.\u003cbr\u003eगेल्या दोन-तीन वर्षांत 'निसर्ग मित्र'च्या माध्यमातून महिला बचत गट, विविध सामाजिक संस्था तसेच दैनिक सकाळ, कोल्हापूर यांच्या सहकार्याने अनेक ठिकाणी रानभाज्यांची प्रदर्शने व स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. सकाळ ॲग्रोवन या कृषी दैनिकाचे संपादक श्री. आदिनाथ चव्हाण यांच्या सूचनेनुसार जानेवारी २०१४ ते जुलै २०१५ या कालावधीत 'ओळख रानभाज्यांची' ही लेखमाला प्रसिद्ध करण्यात आली. संपूर्ण महाराष्ट्रातून या लेखमालेस मोठा प्रतिसाद मिळाला. यात सर्वसामान्य वाचक, शेतकरी, वनस्पती व कृषी तज्ज्ञ सर्वांचाच समावेश होता. काही हॉटेल व्यावसायिकांनी रानभाज्यांच्या निवडक पाककृती त्यांच्या हॉटेलमध्ये ग्राहकांना देण्याची इच्छा व्यक्त केली. रानभाज्यांची शेती करता येईल का, याबाबताही अनेक शेतकऱ्यांनी चौकशी केली. 'ॲग्रोवन'मधून प्रसिद्ध झालेल्या या लेखांचा संग्रह पुस्तकरूपाने प्रकाशित करण्याबाबत सूचना सर्वांनीच केल्या.\u003cbr\u003e'ॲग्रोवन'च्या वाचकांची इच्छा व सकाळ माध्यम समूहाचे सहकार्य यातून 'आरोग्यदायी रानभाज्या' पुस्तकाची निर्मिती झाली आहे. या पुस्तकात ६१ रानभाज्यांची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. प्रत्येक रानभाजीचे शास्त्रीय नाव, कुळ, स्थानिक नाव, इतर भाषेतील नावे, रानभाज्यांचे आढळस्थान, त्यांची शास्त्रीय ओळख, आरोग्यास पोषक ठरणारे गुणधर्म व विविध पाककृती याबाबतची परिपूर्ण माहिती आणि त्याबरोबरच रानभाज्यांची रंगीत छायाचित्रे पुस्तकात देण्यात आली आहेत. या पुस्तकास वाचकांकडून उत्तम प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा आहे.\u003cbr\u003e'निसर्गमित्र' संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. सुरेश शिपूरकर तसेच श्री. अनिल चौगुले, श्री. अनिल वेल्हाळ, डॉ. अशोक वाली व डॉ. हरिश नांगरे या सर्वांचे मन:पूर्वक आभार. सकाळ प्रकाशनाचे श्री. आशुतोष रामगीर तसेच त्यांचे सहकारी या सर्वांचे पुस्तकाच्या उत्कृष्ट निर्मितीबाबत मी आभार मानतो.\u003cbr\u003eनिसर्गप्रेमी, आयुर्वेदप्रेमी, आहारतज्ज्ञ, विद्यार्थी, शिक्षक, शेतकरी, महिला व हॉटेल व्यावसायिक सर्वांनाच हे पुस्तक निश्चितच उपयुक्त ठरेल असा विश्वास वाटतो. वाचकांनी आपले अभिप्राय, सूचना अवश्य कळवाव्यात. धन्यवाद!\u003cbr\u003eडॉ. मधुकर बाचूळकर\u003c\/p\u003e\n\u003ch5\u003e\n\u003cbr\u003eविषयप्रवेश\u003c\/h5\u003e\n\u003cp\u003e\u003cbr\u003eनिसर्गातील सजीव संपत्ती म्हणजेच जैवविविधता. कोट्यवधी वर्षांच्या उत्क्रांतीतून जैवविविधता पृथ्वीवर निर्माण होत गेली. आणि त्यातूनच पुढे मानवाचा जन्म झाला. भौगोलिक परिस्थिती, वातावरण व हवामान ज्याप्रमाणे बदलते, त्याचप्रमाणे सजीवांतील विविधता बदलते. उष्णकटिबंधीय प्रदेशात हवामान, वातावरण व भौगोलिक परिस्थितीत मोठी विविधता आहे, म्हणूनच या प्रदेशात जैवविविधता अत्यंत समृद्ध आहे. शीत कटिबंधीय किंवा ध्रुव प्रदेशात मात्र जैवविविधतेचे प्रमाण तुलनेने कमी आहे. पृथ्वीतलावावरील जैवविविधतेपैकी सुमारे ७० टक्के जैवविविधता उष्ण कटिबंधातील पर्जन्यवनांत आढळते.\u003cbr\u003eजैवविविधतेचा पहिला शास्त्रीय अभ्यासक कार्ल लिनियस (१७०७-१७७८) हा होय. लिनियसच्या अभ्यासानंतर सुमारे ३०० वर्षांचा कालावधी लोटला, पण जैवविविधतेचा अभ्यास अपूर्णच आहे. फक्त १८ ते २० टक्के सजीव प्रजातींचीच आपणास शास्त्रीय ओळख झाली आहे. अद्यापही सुमारे ८० टक्के सजीव सृष्टी आजच्या विज्ञान-तंत्रज्ञान युगातही मानवास अपरिचितच आहे. मानवाला आज सर्वसाधारणपणे साडेचार लाख इतक्या वनस्पतीच्या प्रजाती ज्ञात आहेत.\u003cbr\u003eमानवाच्या सर्वांगीण शाश्वत विकासात जैवविविधतेचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. सजीव सृष्टीतील सर्व घटक, प्रत्येक घटक एकमेकांशी व मानवाशी संबंधित असल्याने जैवविविधतेतील प्रत्येक घटकाचे संरक्षण व त्यांचे संवर्धन होणे आवश्यक आहे. आपल्या सभोवताली असणारी जैवविविधता आपणास उपयुक्त आहे. अन्न, वस्त्र व निवारा तसेच आरोग्यादायी पर्यावरण या मूलभूत गरजांसाठी मानव संपूर्णपणे वनस्पतींवर अवलंबून आहे. निसर्गातील वनस्पती विविधता मानवी जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाची मानली जाते.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cbr\u003eभारतातील जैव विविधता\u003cbr\u003eपृथ्वीतलावावरील १७ देश जैवविविधतेने अत्यंत समृद्ध आहेत. अभिमानाची बाब म्हणजे या देशांत आपल्या भारताचा समावेश होतो. आपल्या देशातील उत्तर-पूर्व हिमालय भूप्रदेश (ईशान्य भारत), पश्चिम घाट परिसर, उत्तर-पश्चिम हिमालय भूप्रदेश व अंदमान-निकोबार बेटांचा परिसर हे भारतातील महत्त्वाचे जैवविविधता संपन्न भूप्रदेश म्हणून ओळखले जातात. आपल्या देशात सुमारे ४८ हजार वनस्पती प्रजातींची नोंद करण्यात आली असून यापैकी १७,५०० प्रजाती सपुष्प वनस्पतींच्या आहेत. भारतात आठ हजार औषधी वनस्पतीच्या प्रजाती आहेत, तर गवतांच्या १२०० प्रजाती आहेत. भारत भू-भौतिक, भौगोलिक व वातावरणीयदृष्ट्या विविधता असणारा देश असल्यानेच आपल्याकडे वनस्पती व प्राण्यांची एक उच्च प्रतीची जैविक विविधता आहे. जगातील एकूण जैवविविधतेच्या ६.७ टक्के जैवविविधता भारतात आढळते. जगभरातील एकूण वनस्पती संपदेपैकी ७.१ टक्के वनस्पती तर एकूण प्राणी प्रजातींपैकी ६.७ टक्के प्राणी प्रजाती आपल्या देशात वास्तव्य करतात.\u003cbr\u003eजैवविविधतेच्या दृष्टीने भूतलावरील ३५ भूप्रदेश 'अतिसंवेदनशील' म्हणजेच शास्त्रीय भाषेत 'हॉट स्पॉट रिजन्स' म्हणून ओळखले जातात. या भूप्रदेशांत अति दुर्मिळ, संकटग्रस्त व प्रदेशनिष्ठ (इंडेमिक) प्रजातींचे वास्तव्य मोठ्या प्रमाणात आहे, पण या प्रदेशात मानवी हस्तक्षेप प्रचंड प्रमाणावर असल्याने तेथील सजीवांच्या प्रजाती नष्ट होण्याचे प्रमाण अत्यंत वेगवान व चिंताजनक आहे. आपल्या देशातील उत्तरपूर्व हिमालय भूप्रदेश व पश्चिम घाट परिसर जागतिक 'हॉट स्पॉट रिजन्स' म्हणून ओळखले जातात.\u003cbr\u003eमहाराष्ट्रातील नंदुरबार, नाशिक, धुळे, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर तसेच कोकण विभागातील ठाणे, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांचे काही भूभाग या पश्चिम घाट परिसरात असून सुद्धा अत्यंत समृद्ध जैवविविधता आहे. या उत्तर पश्चिम घाटास आपण 'सह्याद्री' म्हणतो. या परिसरात महाराष्ट्रातील १२ जिल्हे व ६२ तालुके समाविष्ट आहेत व येथे अत्यंत समृद्ध जैवविविधता आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cbr\u003eवनस्पती विविधता आणि रानभाज्या\u003cbr\u003eअन्नासाठी माणूस विविध पिकांवर अवलंबून असल्याने या पिकांची तो शेतात लागवड करतो. भारतात आज विविध पिकांच्या सुमारे १६६ प्रमुख प्रजाती आहेत. आणि सुमारे ३२० प्रजाती, या पिकांच्या जंगली वाणांच्या आहेत. नवीन संकरित वाण तयार करण्यासाठी जंगली वाणांचा वापर केला जातो.\u003cbr\u003eमानवी आहारात प्रामुख्याने वनस्पतींचा समावेश असतो. धान्य, कडधान्य यांच्यानंतर मानवी आहारातील प्रमुख घटक म्हणजे भाजी. वनस्पतींचे विविध भाग माणसाच्या आहारात भाजी म्हणून वापरले जातात. खोड, पाने, फळे, बिया, कंद, मुळे, फुले यांचा भाजी म्हणून वापर केला जातो. भारतात भाज्यांच्या सुमारे ५५ प्रजाती आहेत. बटाटा, मिरची, टोमॅटो, कोबी, फ्लॉवर यांसारख्या भाज्यांच्या अनेक प्रजाती विदेशी असून विविध देशांतून या प्रजाती शेकडो वर्षांपूर्वी भारतात आल्या आहेत. भाजीसाठी वापरल्या जाणाऱ्या बहुतांश वनस्पतींची शेतात लागवड केली जाते.\u003cbr\u003eअलीकडील काळात बाजारपेठेत भाज्यांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यामुळे भाजी उत्पादनात वाढ करण्यासाठी आज अमर्यादित प्रमाणात रासायनिक खतांचा, रासायनिक द्रव्यांचा शेतकरी वापर करीत आहेत. यामुळे उत्पादनात, भाज्यांच्या प्रमाणात वाढ झाली आहे, पण त्यांची नैसर्गिक चव, पोषणमूल्यांचे प्रमाण कमी होत चालले आहे. यामुळे पिकांवर जिवाणू, विषाणू, बुरशी व कीटकजन्य रोगांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होऊ लागला आहे. या रोगांना आटोक्यात आणण्यासाठी शेतकरी पिकांवर मोठ्या प्रमाणात विषारी, रासायनिक जिवाणू-विषाणूनाशके, बुरशीनाशके, कीटकनाशके फवारतात. अशा भाज्यांच्या वापरामुळे माणसांमध्ये सांधेदुखी, कॅन्सर, अल्सर, घशाचे, पोटाचे विकार इत्यादी होऊ लागले आहेत. यासाठी सर्वांनी पारंपरिक भाजी पिकांना पर्याय म्हणून रानभाज्यांचा विचार अवश्य केला पाहिजे.\u003cbr\u003eआपल्या सभोवताली समृद्ध वनस्पती संपदा आहे. शेतात, ओसाड जमिनीवर, बागेत, परसात, जंगलात अनेक वनस्पती आहेत, काही तणे आहेत. यातील काहींचा आपणास रानभाज्या म्हणून वापर करता येतो. पण यासाठी आपल्या सभोवताली असणाऱ्या वनस्पतींची ओळख व त्यांचा उपयोग याबाबातची प्राथमिक स्वरूपाची माहिती असणे आवश्यक आहे.\u003cbr\u003eया प्रकारची माहिती खेड्यात, वनांत राहणाऱ्यांना, ग्रामीण भागातील महिलांना, ग्रामस्थांना असते. ते पारंपरिक पद्धतीने अशा वनस्पतींचा आपल्या आहारात भाजी म्हणून सर्रास वापर करतात. अशा रानभाज्यांची सर्वांना ओळख व्हावी व त्यांनी त्यांच्या आहारात रानभाज्यांचा वापर करावा या हेतूने 'आरोग्यदायी रानभाज्या' या पुस्तकाचे लिखाण केले आहे. या आगळ्यावेगळ्या विषयावरील पुस्तकास वाचकांकडून उत्तम प्रतिसाद मिळेल असा विश्वास वाटतो. या पुस्तकात रानभाज्यांची माहिती, त्याची स्थानिक व शास्त्रीय नावे, त्यांचे शास्त्रीय कुळ, छायाचित्र, त्यांचे औषधी गुणधर्म व उपयोग आणि पाककृती याबाबतची माहिती दिली आहे.\u003c\/p\u003e\n\u003ch5\u003eअनुक्रमणिका (रानभाज्यांची यादी)\u003c\/h5\u003e\n\u003cp\u003e\u003cbr\u003e१. अळू\u003cbr\u003e२. आघाडा\u003cbr\u003e३. आंबाडा\u003cbr\u003e४. आंबुशी\u003cbr\u003e५. उंबर\u003cbr\u003e६. कपाळफोडी\u003cbr\u003e७. कमळकाकडी\u003cbr\u003e८. करमळ\u003cbr\u003e९. करटोली\u003cbr\u003e१०. करवंद\u003cbr\u003e११. कांडवेल\u003cbr\u003e१२. कामोणी\u003cbr\u003e१३. काटेकोळसुंदा\u003cbr\u003e१४. काटेमाठ\u003cbr\u003e१५. कुडा\u003cbr\u003e१६. कुरडू\u003cbr\u003e१७. केना\u003cbr\u003e१८. गोखरू\u003cbr\u003e१९. गोजिभ\u003cbr\u003e२०. गुळवेल\u003cbr\u003e२१. घेतुळी\u003cbr\u003e२२. घोटवेल\u003cbr\u003e२३. घोळ\u003cbr\u003e२४. चंदन बटवा\u003cbr\u003e२५. चिवळ\u003cbr\u003e२६. चुका\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"Sakal Prakashan","offers":[{"title":"1 Book","offer_id":57228501221679,"sku":null,"price":399.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0848\/8065\/4639\/files\/9BB63F99-686D-42A2-B1B4-DCE401635EAF.jpg?v=1777119777","url":"https:\/\/pipagro.com\/products\/aarogyadayi-ranbhajya-healthy-wild-vegetables-dr-madhukar-bachulkar","provider":"PIP AGRO","version":"1.0","type":"link"}