Sacred plants of India | भारतातील पवित्र वनस्पती | Nanditha Krishna & M. Amirthalingam

Unlocking the secrets of India’s sacred trees: Where divine tradition meets Spirituality

5.0 | 1 Reviews
₹ 450.00

MRP (Incl. of all taxes)

Check Delivery Availability
USP badge
USP badge
USP badge
USP badge
Sacred plants of India | भारतातील पवित्र वनस्पती | Nanditha Krishna & M. Amirthalingam
Sacred plants of India | भारतातील पवित्र वनस्पती | Nanditha Krishna & M. Amirthalingam ₹ 450.00
1 / 11
प्रस्तावना

भारत हा जैववैविध्याने समृद्ध देश आहे. प्राणी आणि वनस्पतींच्या जनुकीय संपत्तीच्या देणगीला किमान चार मुख्य घटक जबाबदार आहेत; ते म्हणजे - सांस्कृतिक विविधता (आध्यात्मिक मूल्यांसह), पाककलेतील विविधता, औषधोपचारांची विविधता ( औषधी वनस्पतींच्या असंख्य प्रजाती) आणि परिसंस्थांची विविधता. यातील आध्यात्मिक मूल्यांनी अनेक महत्त्वाच्या वृक्ष-वनस्पतींच्या संरक्षणाला योगदान दिले आहे. भारतातील अनेक पवित्र वनस्पती आणि वृक्षराजींविषयीची चित्तवेधक माहिती या पुस्तकाने वाचकांसमोर ठेवली आहे. निवडक वनस्पतींना पावित्र्य बहाल करण्यासाठी प्राचीन काळापासून केल्या गेलेल्या प्रयत्नांचा उल्लेखही या पुस्तकात आहे. मंदिरांचे स्थळ वृक्ष हे आपला जैविक वारसा साजरा करण्याच्या परंपरेचे उत्तम उदाहरण आहे. हे पुस्तक वाचत असताना मला जॉईस किलमर यांची कविता आठवली -


I think that I shall never see
A poem as lovely as a tree.

A tree whose hungry mouth is press
Against the earth’s sweet flowing breast;

A tree that looks at God all day,
And lifts her leafy arms to pray;

A tree that may in summer wear
A nest of robins in her hair;

Upon whose bosom snow has lain;
Who intimately lives with rain.

Poems are made by fools like me,
But only God can make a tree.

१९७६ मध्ये मी भारतातील प्राचीन झाडांचा अभ्यास हाती घेतला. मी सगळ्या राज्यांच्या मुख्य वनसंरक्षकांना पत्र लिहून त्यांच्या राज्यातील सर्वात प्राचीन झाडांविषयीची माहिती कळवण्याची विनंती केली. बहुतेक उत्तरे वटवृक्षाविषयीची होती. त्यात चेन्नई येथील थिऑसॉफिकल सोसायटीच्या वटवृक्षाचाही समावेश होता. अनेक प्रसिद्ध वटवृक्ष संत आणि मंदिरांशीही संबंधित होते. चिदंबरम येथील प्रसिद्ध नटराज मंदिराच्या Excoecaria agallocha या मंदिर-वृक्षांसारख्या अनेक वृक्षांची पूजा होत आली, ती एकूणच जगण्यासाठी आणि उपजीविकेसाठी असलेल्या त्यांच्या महत्त्वामुळे. उदाहरणार्थ, चिदंबरम येथील हा मंदिर- वृक्ष आहे खारफुटी किनारी प्रदेशातील वादळे आणि त्सुनामीपासून संरक्षण देणाऱ्या सुरक्षाकवचाची भूमिका खारफुटी पार पाडत असल्यामुळे मंदिर-वृक्षाचे स्थान या वनस्पतीला दिले गेले असावे. भारतातील सर्वाधिक प्राचीन वृक्षाविषयीच्या माझ्या अभ्यासातून तुती (Morus serrata) या प्रजातीचा वृक्ष सर्वात प्राचीन (१२०० वर्षांहून जास्त) असू शकतो, हे स्पष्ट झाले. जोशी मठाच्या परिसरात एका भव्य मलबेरी वृक्षाखाली आद्य शंकराचार्यांनी ध्यानधारणा केली होती. ज्या वेळी शंकराचार्यांनी या झाडाखाली उपदेश केला, त्या वर्षापासूनच आपण या झाडाचे वय मोजू शकतो. याचाच अर्थ, आपला आध्यात्मिक इतिहास आणि पवित्र वृक्षांचा इतिहास यांच्यामध्ये घट्ट नाते आहे (Indian Farming, फेब्रुवारी, १९७७). प्रस्तुत पुस्तकात भारताच्या अत्यंत सुंदर अशा जीवशास्त्रीय आणि आध्यात्मिक वारशाचे कवडसे दाखवल्याबद्दल नंदिता कृष्णा आणि एम. अमिर्तलिंगम या दोघांचे आपण सर्वांनीच मन:पूर्वक आभार मानायला हवेत.

चेन्नई
प्रा. एम. एस. स्वामिनाथन

लेखकाचे मनोगत 

सकाळी उठून मी खिडकीबाहेर बघते, तेव्हा प्रथम मला दिसतो, तो कैलासपतीचा वृक्ष. त्याच्या विस्कटलेल्या फांद्या फुलांच्या झुबक्यांचे वजन न पेलवून जमिनीकडे झुकलेल्या असतात. जमिनीवरही गळून पडलेल्या फुलांचा सडा असतो. माझा माळी ही फुलं काळजीपूर्वक गोळा करून डायनिंग टेबलवरच्या पाण्यानं भरलेल्या मोठ्या वाडग्यात ठेवतो. यामुळे मनावरचा ताण हलका होतो. कैलासपतीच्या फुलांचा तो गुणधर्मच आहे. माझा जन्म एका जुन्या ब्रिटिशकालीन बंगल्यात झाला. माझ्या वाडवडिलांपासूनचं मद्रासमधलं ते घर 'द ग्रोव्ह' म्हणून ओळखलं जायचं. घराभोवतीच्या बागेच्या लांबलचक पट्ट्यात एक पिंपळाचं झाड होतं, आजही आहे. या झाडाखाली वेगवेगळ्या आकाराच्या लहान-मोठ्या पाच नागशिळा आणि एक गणपतीची उठावाची मूर्ती होती. नागशिळा माझ्या आजीनं १९०३ ते १९०५ या काळात स्थापन केल्या होत्या. गणपती पल्लव कालखंडातला होता. पिंपळाला, गणपतीला आणि नागशिळांना प्रदक्षिणा घालून दररोज सकाळी माझ्या मॉर्निंग वॉकची सुरुवात होते. सोमवारच्या दिवशी पौर्णिमा यायची, तेव्हाचे दिवस मला अजून आठवताहेत. तिनांपेट गावातल्या बायकांचे घोळकेच्या घोळके या झाडाला १०८ प्रदक्षिणा घालण्यासाठी यायचे. माझी आजीही हा नवस बोलली होती; पण तिची तब्येत बरी नसल्यामुळे तिला ते शक्य होत नव्हतं. म्हणून मग तिच्याऐवजी मी प्रदक्षिणा घालायचे आणि ती पिंपळाच्या झाडाखाली बसून प्रार्थना म्हणत राहायची आणि ध्यानधारणा करायची. आणि सर्वत्र संचार असणारी तुळस तर आजही घराच्या मधल्या खुल्या चौकात अभिमानपूर्वक आपलं स्थान टिकवून आहे. भारताच्या प्राचीन भूतकाळातल्या या पवित्र वनस्पती माझ्या व्यक्तिगत परंपरेचा असा अतूट भाग होऊन राहिल्या आहेत. त्यामुळेच आपला समृद्ध वारसा समजून घेण्यासाठीचं पुढचं संशोधन माझ्यासाठी आवश्यक ठरणं अटळच होतं. मी भारतभरात अनेक ठिकाणच्या पवित्र वनस्पती पाहिल्या आहेत. हृषिकेशमधला पिंपळ, वृंदावनातली तुळस, कुंभकोणममधल्या वैदिश्वरन मंदिराचा औषधी कडुनिंब आणि राजस्थानातल्या देवरायांमधलं खेजडीचं झाड! या वनस्पती पाहताना आपल्या प्राचीन परंपरेचं ज्ञान जाणवून मी थक्क झाले. या पुस्तकात सांगितलेल्या अनेक कथा मला माझ्या कुटुंबातल्या ज्येष्ठांकडून आणि मला किंवा अमिर्तलिंगमला आमच्या प्रवासांत भेटलेल्या वयस्कर व्यक्तींकडून कळल्या. उरलेल्या काही कथा संस्कृत आणि तामिळ साहित्यातल्या किंवा त्या-त्या मंदिरांच्या स्थळ पुराणांतल्या (स्थानिक इतिहास) आहेत. या सगळ्या मौखिक परंपरा आहेत आणि त्यांनीच आपल्या भारतीय समाजाला एका सूत्रात ओवलं आहे. एम. अमिर्तलिंगम वैज्ञानिक आहेत. सी. पी. आर. एनव्हिरॉनमेंटल एज्युकेशन सेंटरमध्ये ते पर्यावरणशिक्षण अधिकारी आहेत. तामिळनाडूमधल्या आणि तामिळ साहित्यातल्या देवराया आणि पवित्र वनस्पतींच्या दस्तावेजीकरणाचं अतिशय अजोड असं काम त्यांनी केलं आहे. हे पुस्तक लिहिण्यासाठी त्यांनी माझ्यासोबत महत्त्वाचं काम केलं आहे. थोडक्यात, हे पुस्तक म्हणजे इतिहासतज्ज्ञ आणि वनस्पतिशास्त्रज्ञ, संस्कृततज्ज्ञ आणि तामिळतज्ज्ञ यांच्या एकत्रित संशोधनाचा परिपाक आहे. ज्येष्ठ वैज्ञानिक आणि हरितक्रांतीचे जनक डॉ. एम. एस. स्वामिनाथन यांनी या पुस्तकाला प्रस्तावना लिहिण्याचं मान्य केलं, हा आमचा मोठा सन्मान आहे. आम्ही त्यांचे मनापासून ऋणी आहेत. या पुस्तकासाठी अनेक जणांची अनेक प्रकारे मदत झाली आहे. डॉ. पी. सुधाकर यांनी फोटो काढले आणि वर्गीकरण तपासलं. विशेषतः लॅटिन नावं, वनस्पतितज्ज्ञांनी शोधलेल्या वनस्पतींची नावं याविषयी त्यांनी खात्री करून घेतली. वाय. वेंकटेश आणि प्रेमा श्रीनिवासन यांनी रेखाचित्रं काढली. जी. बालाजी आणि आर. सत्यनारायणन यांनी रेखाचित्रं आणि छायाचित्रं यांवर आवश्यक संगणकीय प्रक्रिया केली. सी. पी. आर. एनव्हिरॉनमेंटल एज्युकेशन सेंटरच्या ग्रंथपाल एस. पी. विजयाकुमारी आणि सी. पी. रामस्वामी अय्यर फाऊंडेशनचे ग्रंथपाल व्ही. कामेश राज यांनी आम्हांला हव्या असलेल्या पुस्तकांचा आणि लेखांचा शोध घेऊन ती मिळवली आणि एच. मणिकंदन यांनी आम्ही जमा केलेल्या साधनांचा अखंड पुरवठा काळजीपूर्वक सांभाळण्याचं काम केलं. पेंग्विन इंडियाचे उदयन मित्र आणि अमेय नागराजन, पेंग्विन इंडियात पूर्वी असलेले रवी सिंग यांनी या पुस्तकात दाखवलेला रस आणि उत्साह, यामुळेच हे पुस्तक प्रसिद्ध होऊ शकलं. पेंग्विन इंडियाच्या कॉपी एडिटर श्रुती नारायण यांनी खूप वेळ घालवून आणि कष्ट घेऊन या पुस्तकातला प्रत्येक शब्द आणि ओळ तपासली आणि पुस्तक सुधारण्यासाठी फार उत्तम सूचना केल्या. , शेवटी मला एवढंच सांगावंसं वाटतं की झाडं आणि जंगलं यांना पवित्र मानलं गेलं, कारण आपल्या पूर्वजांना पर्यावरणातील त्यांची महत्त्वाची भूमिका माहीत होती- झाडं आपल्याला प्राणवायू देतात, प्रदूषकं शोषून घेऊन हवा शुद्ध करतात, खायला अन्न देतात, घरं बांधण्यासाठी आवश्यक साहित्य देतात, पक्षी-प्राण्यांना राहायला निवारे देतात, आपल्याला औषधं देतात आणि आणखीही अनेक गोष्टी करतात. त्यांच्या जवळचं ज्ञान आणि वैज्ञानिक माहितीविषयी त्यांना असणारा आदर आपल्या ज्ञानापेक्षा आणि आदरापेक्षा कितीतरी जास्त होता. पर्यावरणावरच्या परिणामांचा विचारही न करता आपण झाडं तोडतो आणि जंगलं नष्ट करतो. यामुळे जागतिक तापमानवाढ आणि हवामान बदलासारख्या अनेक मोठ्या संकटांना आमंत्रण देऊन आपण पृथ्वीला कडेलोटाच्या बिंदूपर्यंत आणलं आहे. निसर्ग मनुष्यापेक्षा अधिक सामर्थ्यशाली आहे आणि तोच अंतिम युद्ध जिंकणार; हे लक्षात घ्यायला अजूनही उशीर झालेला नाही. आपल्या स्वतःच्याच हितासाठी, निसर्गातील अनेकानेक सुंदर वनस्पतींचं संवर्धन करण्याची गरज आहे.

चेन्नई नंदिता कृष्णा

हे पुस्तक का वाचावे?

तुम्ही कधी विचार केला आहे का, आपल्या पूर्वजांनी पिंपळ, वड किंवा तुळशीला केवळ 'देव' का मानले असेल? हे निव्वळ अंधश्रद्धा नसून, त्यामागे एक खूप मोठे 'शास्त्रीय आणि पर्यावरणीय विज्ञान' दडलेले आहे. नंदिता कृष्णा आणि एम. अमृता लिंगम यांचे 'भारतातील पवित्र वनस्पती' (सकाळ प्रकाशन) हे पुस्तक म्हणजे केवळ कागदांची बांधणी नसून, ती आपल्या हजारो वर्षांच्या समृद्ध संस्कृतीची गुरुकिल्ली आहे.

हे पुस्तक का वाचावे? काही रंजक कारणे:

१. निसर्गाची भाषा: आपण आज कोणताही विचार न करता झाडे तोडतोय, पण या पुस्तकातून आपल्याला कळेल की, प्रत्येक वृक्षाचा स्वतःचा एक 'प्राण' आणि 'हेतू' आहे.

२. धार्मिकतेचा वैज्ञानिक दृष्टीकोन: देवाच्या पूजेत आपण बिल्वपत्र किंवा दुर्वा का वापरतो? यामागे आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवणारे औषधी गुणधर्म कसे दडलेले आहेत, याचे रहस्य उलगडते.

३. विस्मृतीत गेलेला इतिहास: ही झाडे नेमकी कुठे तयार झाली? त्यांचा प्रवास कसा झाला? आपल्या ऋषीमुनींनी त्यांचे पूजन करताना पर्यावरणाचे रक्षण कसे केले? हे वाचून तुम्ही थक्क व्हाल.

४. आरोग्याचा कणा: आपली आरोग्याची समस्या, मग ती साधी सर्दी असो किंवा दीर्घकालीन आजार, निसर्गाच्या या पवित्र वनस्पतींमध्येच उत्तर आहे.

५. संस्कृतीचा वारसा: हे पुस्तक म्हणजे आपल्या पिढीसाठी एक 'कॉल टू ॲक्शन' आहे. आपण निसर्ग नष्ट करत नाही, तर स्वतःचे अस्तित्वच धोक्यात आणत आहोत, हे या पुस्तकातून प्रकर्षाने जाणवते.

हे पुस्तक म्हणजे केवळ माहितीचा साठा नाही, तर निसर्गाकडे पाहण्याचा एक नवा दृष्टिकोन आहे. आपण जर या वनस्पती जपल्या नाहीत, तर पुढील पिढीला आपण काय देणार? चला, या पवित्र वारशाचा पुन्हा शोध घेऊया.

हे पुस्तक वाचा, कारण ते केवळ झाडांबद्दल नाही, तर आपल्या अस्तित्वाच्या मुळांबद्दल आहे!