प्रस्तावना
‘सकाळ प्रकाशन’चे ‘शेती मित्रपक्षी’ हे पुस्तक महाराष्ट्रातल्या सर्वात मोठ्या जनसमुदायासाठी मैलाचा दगड ठरेल. एका सर्वसामान्य, दुर्लक्षित विषयावर लिहिलं गेलेलं हे मराठीतील कदाचित पहिलंच पुस्तक असेल, ज्यासाठी माझे मित्र डॉ. महेश गायकवाड यांचे हार्दिक अभिनंदन. पक्षी आणि शेती तसा चर्चेचा विषय, कारण बरेचशे पक्षी जरी शेती मित्र असले तरी काही पक्षी शेतकऱ्यांचे नुकसानदेखील करतात. पण सर्वांगीण विचार केला तर पक्षांशिवाय हे निसर्गचक्र चालू शकत नाही, हेही तितकंच खरं.
शेतीखालील जमीन हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा भूभाग असून इथल्या विविध जीवांचं हे एक मोठं आश्रयस्थान आहे. त्यातच कीटकनाशकांच्या वाढत्या वापरामुळे इथली जीवसंपदा धोक्यात आली आहे. कीटकनाशकांमुळे मधमाशीसारखे उपयोगी कीटक कमी होत चालले आहेत, जी एक चिंतेची बाब आहे. पक्षी हे एका निरोगी परिसंस्थेचे द्योतक असून जर ते त्यांच्या अधिवासातून नष्ट होत असतील तर निसर्गचक्रात काही तरी बिघाड झाल्याचे समजून घ्यावे. उदाहरण द्यायचेच झाले तर, अंड्यातून बाहेर पडलेल्या पिलांचे अळ्या आणि किडे हे मुख्य अन्नघटक असतात जे आता शहरात बऱ्याचशा प्रमाणात कमी झाल्याचे आढळतात. त्यामुळे चिमणीसारखे पक्षीही शहरात दुर्मिळ झालेले दिसून येतात. महाराष्ट्रात संकटग्रस्त सूचित समाविष्ट केल्या गेलेल्या किमान ४८ पक्षी प्रजाती आढळून आल्या आहेत ज्यांचं संरक्षण करणं ही आपली नैतिक जबाबदारी आहे; नव्हे गरज आहे.
कमी झालेले सलग गवताळ प्रदेशांचे पट्टे, जंगलावरील अतिक्रमणे, कमी होत चाललेली आणि मानवी हस्तक्षेपामुळे उद्ध्वस्त होत असलेली प्रजनन स्थळे ही अशाश्वत विकासाची लक्षणे असून केवळ पक्ष्यांच्याच नव्हे तर मनुष्य जातीच्या विनाशासाठीदेखील धोक्याची घंटा ठरू शकते. म्हणून आताच योग्य पावलं उचलणं गरजेचं आहे. मिश्र पीक शेती, सेंद्रिय शेती, पारंपरिक शेती अशा शाश्वत पद्धती तात्काळ फायदा देत नसल्या तरी मनुष्य जातीच्या भविष्यासाठी या अत्यंत गरजेच्या आहेत आणि त्याशिवाय आपल्याला भविष्यात पर्यायदेखील नाही.
शेतकरी आणि पक्षी यांचे एकमेकांशी असलेले संबंध, प्रत्येक पक्षी प्रजातीची वैशिष्ट्ये, त्यांचा आढळ, विणीचा हंगाम, शेतीसाठी उपयुक्तता आणि काही दुर्मिळ होत चाललेल्या प्रजातींच्या संवर्धनासाठी दिल्या गेलेल्या उपाययोजना अशा ठळक नोंदी सामान्य लोकांना समजतील अशा भाषेत दिल्या गेल्या आहेत. या पुस्तकात पक्ष्यांचे केले गेलेले- घराशेजारील पक्षी, माळरानावरील पक्षी, पाण्याशेजारचे पक्षी आणि शिकारी पक्षी- असे वर्गीकरण वाचकांना नक्कीच सोयीचे ठरेल.
मला आठवते आहे, मी जेव्हा जेव्हा माझ्या आसांकडे सोलापूर-उस्मानाबादला दुर्बीण घेऊन जायचो तेव्हा लोकांना वाटायचे, ‘हा काय नुसत्या काळ्या, पिवळ्या, लाल चिमण्या बघत उपद्व्याप करत असतो.’ पण जेव्हा मी त्यांना प्रत्येक प्रजातीबद्दल सांगायचो आणि त्याबरोबर फोटो दाखवायचो तेव्हा सगळ्यांना कौतुक वाटायचं. पक्षिनिरीक्षणापासून कोसो दूर असलेल्या खेड्यापाड्यातसुद्धा शिकलेली मुलं आता पक्षी, वटवाघळे, फुलपाखरे, मधमाश्या आणि त्यांचे उपयोग याबद्दल बोलायला लागली आहेत. गरज आहे ती अशा सर्वसामान्य नागरिकांनी आणि पक्षीतज्ज्ञांनी एकत्र येण्याची.
पक्षिनिरीक्षणाबद्दल थोडक्यात दिलेली मुद्देसूद माहिती ही नवीन पक्षिनिरीक्षकांना नक्कीच फायद्याची ठरेल आणि लोक निदान आपल्या शेतात, परसदारात दिसणाऱ्या पक्ष्यांच्या नोंदी ठेवायला सुरुवात करतील अशी अपेक्षा आहे. निसर्गसंवर्धनाची आज कधी नव्हे इतकी गरज निर्माण झाली आहे. जर प्रत्येक व्यक्ती पक्षिनिरीक्षण करायला शिकली तर आपोआप पक्षिसंवर्धनासाठी एक भली मोठी फौज तयार होईल. ‘सकाळ प्रकाशना’च्या पुढाकाराने हे पुस्तक निसर्गसंवर्धनातील प्रमुख घटक असणाऱ्या शेतकऱ्यांना सहज उपलब्ध होईल आणि एक पक्षिनिरीक्षणाची मोठी चळवळ आपोआप उभी राहील अशी आशा आहे.
या पुस्तकाला उदंड प्रतिसाद लाभून याच्या नवनवीन अद्ययावत आवृत्त्या निघाव्यात हीच माझी सदिच्छा.
सुजीत शिवाजी नरवडे
प्रकल्प शास्त्रज्ञ
बी.एन.एच.एस.-इंडिया, मुंबई
लेखकाचे मनोगत
शेती मित्रपक्षी’ पुस्तक लिहिण्याची प्रेरणा मा. ना. अजितदादा पवार (माजी उपमुख्यमंत्री) यांच्याशी एका चर्चेदरम्यान मिळाली. या चर्चेदरम्यान दादा म्हणाले, की हे पक्षी शेतीसाठी इतक्या मोठ्या प्रमाणावर उपयुक्त असताना याविषयी आतापर्यंत कोणी का लिहिले नाही? या चर्चेनंतर मी ठरवले, की पक्षी आणि वटवाघळांबाबतची सविस्तर लेखन करून त्यांची शेतीतील उपयुक्तता आपण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायची. त्याकरता ‘ॲग्रोवन’चे संपादक आदिनाथ चव्हाण, माझे मित्र गणेश कोरे व सतीश कुलकर्णी यांना भेटलो आणि माझ्या मनातील ही कल्पना त्यांच्या समोर मांडली. त्यानुसार ‘ॲग्रोवन’मधून १५० लेखांद्वारे पक्ष्यांची सविस्तर माहिती देण्याचा आम्ही प्रयत्न केला.
या लेखांमधील माहिती वाचून वाचकांकडून आम्हाला खूप मोलाचा प्रतिसाद मिळाला. मला प्रतिदिन वाचकांचे किमान १० ते १५ फोन कॉल्स येत होते. त्यातील बहुतांश वाचक हे शेतकरी होते. ‘‘हे पक्षी-वटवाघळ आमच्यासमोर सदा वावरत असूनही यांच्याबद्दलची शेतीची उपयुक्तता आम्हाला माहिती नव्हती. ती या लेखांमधून आम्हाला मिळाली.’’ अशी प्रतिक्रिया अनेक शेतकऱ्यांनी नमूद केली. ही माहिती पुस्तकरूपात मिळाल्यास आम्हाला खूप उपयुक्त ठरेल, असेही अनेकांनी सांगितले. हाच हेतू डोळ्यांसमोर ठेवून मी ‘शेती मित्रपक्षी’ हे पुस्तक तयार करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी आदरणीय सौ. सुनेत्रा पवार यांनी मला मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच ‘एन्व्हायर्नमेंटल फोरम ऑफ इंडिया’ या संस्थेतील सर्व सदस्यांनी या पुस्तकासाठी सहकार्य केले. मी त्यांचा शतशः आभारी आहे.
पक्षी हे शेती व निसर्ग यांमधील महत्त्वाचे कार्य करणारे जीव आहेत. खरे तर, पृथ्वीवरील प्रत्येक जीव निसर्गाचा अतिशय महत्त्वाचा घटक आहे; परंतु या जीवांची माहिती सामान्य लोकांपर्यंत पोहोचत नाही. पक्षी हा शेतकऱ्यांच्या आसपासच्या जीवनात सहज आढळणारा आणि आपल्याशी जवळीक साधणारा असा मित्रजीव आहे. या पुस्तकाद्वारे मी या पक्ष्यांची माहिती संकलित करून त्यांची शेतीतील उपयुक्तता आपणासमोर मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे.
पक्ष्यांचा मानवी जीवनाशी खूप जवळचा संबंध आहे. पक्षी पर्यावरण स्वच्छतेचे कार्य करत असल्यामुळे मानवी जीवनावर त्याचा चांगलाच परिणाम होतो. वेगवेगळे पक्षी, त्यांच्या जाती-प्रजाती यांचा सखोल अभ्यास करण्याचा मी प्रयत्न केला. पक्ष्यांच्या हालचाली, त्यांचे राहणीमान, प्रजनन, त्यांचे वर्गीकरण, त्यांच्या जीवनाचा मानवी जीवनाशी असणारा परस्परसंबंध व शेतीबद्दल उपयुक्तता याविषयी माहिती प्रस्तुत पुस्तकात आहे.
हे पुस्तक सर्वांसाठीच उपयुक्त आहे, असे मला वाटते. विद्यार्थी या पुस्तकाचा अभ्यास करून पक्षी, त्यांच्या प्रजाती, त्यांची प्रजनन संस्था, याविषयीची माहिती मिळवू शकतात. शेतकरी आपल्या शेतीसाठी हे पक्षी कशा प्रकारे उपयुक्त आहेत याची सविस्तर माहिती घेऊ शकतात. या पुस्तकाचा मूळ हेतू हा शेती परिसंस्थेशी निगडित असल्याने पक्ष्यांचा शेतीशी असणारा घनिष्ठ असा संबंध येथे विशद केला आहे. पक्षी कीटकभक्षी असल्याने कीटकांपासून कशा प्रकारे ते पिकांचा बचाव करतात. तसेच परागीभवनामध्ये मोलाचे असे कार्य कसे निभावतात आणि आपले उत्पादन कशा प्रकारे वाढवतात याची सविस्तर माहिती संकलित केली आहे. ही माहिती संकलित करताना अनेक संदर्भग्रंथांचा आणि तज्ज्ञ मार्गदर्शकांच्या मार्गदर्शनाचा आधार घेतला आहे. मुख्यत्वे डॉ. सालिम अलींच्या ‘द बुक ऑफ इंडियन बर्ड्स’ (बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी, मुंबई, १९७९) आणि मारुती चितमपल्ली यांच्या ‘पक्षिकोश’ (साहित्य प्रसार केंद्र, नागपूर, २००२) या संदर्भग्रंथांचा उपयोग केला आहे.
आपल्या परिसरातील पक्ष्यांच्या अधिवासांना संरक्षण देणे हे अतिशय महत्त्वाचे व मोठे कार्य आहे. पक्षी वाचले तर आपली शेती वाचेल याचा विचार आपण सर्वांनी करण्याची गरज आहे आणि याची जाणीव प्रत्येकाला असलीच पाहिजे. पक्ष्यांच्या संरक्षणासाठीची ठोस पावले सरकार उचलत आहेच; पण आपण काय करणार याचा विचार आपण प्रत्येकानेच करायला हवा आहे. परिसरातील पक्ष्यांचे संरक्षण म्हणजे त्यांच्या भवतालच्या परिसराचे, पर्यावरणाचे संरक्षण. पक्ष्यांचे संरक्षण म्हणजेच पृथ्वीचे संरक्षण असे समजणे काही वावगे ठरणार नाही.
डॉ. महेश गायकवाड
पर्यावरण अधिकारी
एन्व्हायर्नमेंटल फोरम ऑफ इंडिया
बारामती