मनोगत
प्रत्येक ऋतूत विविध प्रकारे निसर्ग माणसाला भरभरून दान देत असतो. निसर्गाशी जवळीक साधणाऱ्या आदिवासी समाजाने तसेच आपल्या पूर्वजांनी निसर्गाच्या या दानाचे महत्त्व जाणले होते. त्यामुळे पूर्वीपासून त्यांच्या आहारात रानभाज्या होत्या. रानभाज्या म्हणजे रानात नैसर्गिकपणे उगवणाऱ्या भाज्या. दरवर्षी नियमितपणे ठराविक काळात या भाज्या उगवतात. त्यातल्या काही एखाद्या ऋतुपुरत्या, तर काही वर्षभर टिकणाऱ्या. कधी कोवळ्या पानांच्या वेली, कधी फुले-फळे तर कधी कंद-मुळे; भारतातील अनेक आदिवासी लोक तर याच रानभाज्यांवर आपला उदरनिर्वाह करत आले आहेत. काही वेळा ती भाजी औषधी असल्यामुळे तर, कधी उदरभरण म्हणून. या भाज्यांचे विविध उपयोग, त्यांचे औषधी गुणधर्म याबद्दल माहिती करून घेऊन हा अमूल्य ठेवा पुढच्या पिढ्यांनीही जपून ठेवला पाहिजे. मी केलेला रानभाज्यांचा अभ्यास हा याचाच एक प्रयत्न आहे.
मी मूळची आदिवासी भागातीलच, म्हणजे मोखाडा या गावची राहणारी. आमचे गाव डोंगराच्या पायथ्याशी असल्यामुळे अनेक नैसर्गिक झाडे, वनस्पतींनी समृद्ध आहे. अनेक रानभाज्या मला अगदी लहानपणापासूनच परिचयाच्या होत्या. माझी आजी पावसाळ्यात शेवूळ, भुईफोड, चाईचे वेल, कुरडू, बाफळी, माठ, करटूल, कवदर, डोंगरजीरा, तेरा अशा अनेक रानभाज्या विशिष्ट पद्धतीने करून आम्हाला खाण्यास देत असे. तेव्हा ती सांगत असे की, आदिवासी लोक पावसाळ्यात एकदा तरी या भाज्या खातातच. या भाज्यांमुळे त्यांना पोटाच्या विविध समस्या तसेच आम्ल, पित्त, वात अशा शरीराच्या अनेक तक्रारींवर आराम मिळतो. लहानपणी या भाज्या खायला नको वाटायचे. पण कालांतराने त्याचे आहारातील महत्त्व समजू लागले. योगायोगाने त्याच क्षेत्रातले शिक्षण घेऊन तशाच प्रकारचे संशोधन करण्याची संधी मला मिळाली.
पदव्युत्तर शिक्षणानंतर मला 'बायफ' या संस्थेची स्पार्क फेलोशिप मिळाली होती. या फेलोशिपमध्ये १ वर्षासाठी ग्रामीण भागात राहून कुठल्याही एका विषयावर संशोधन करण्याची संधी मला मिळाली. मूळची आदिवासी भागातीलच असल्यामुळे तसेच रानभाज्यांमध्ये विशेष आवड असल्यामुळे मी रानभाज्या हाच विषय निवडला. सुरुवातीपासूनच काही भाज्या मला माहिती होत्या. पण संशोधनाच्या निमित्ताने काम करताना खूप नवीन भाज्या समजल्या, ज्या मी कधीच ऐकल्याही नव्हत्या. त्यासाठी विविध वयोगटातील लोकांशी चर्चा करताना जवळजवळ १२० च्या आसपास भाज्यांची नोंद मी केली. त्यापैकी ९५ भाज्या मी स्वतः पाहिल्या. तसेच कधी तिथल्याच स्थानिक लोकांच्या घरी त्या तयार करण्याच्या पद्धती पाहिल्या तर, कधी घरी आणून त्या त्यांच्याच पद्धतीने करण्याचा प्रयत्न केला. लोकांशी चर्चा करताना असे आढळून आले की पूर्वी मुबलक प्रमाणात येणाऱ्या, सापडणाऱ्या अनेक रानभाज्या आता कमी झाल्या आहेत. काही तर नामशेषही झाल्या आहेत. त्यासाठी अनेक कारणे आहेत. दरवर्षीच्या पावसाच्या अनिश्चिततेमुळे बिया, कंद यांची उगवण क्षमता कमी झाली आहे. तसेच रानभाज्यांची कोवळी पाने, देठे, फुले, कोवळी फळे खाण्यासाठी वापरल्यामुळे त्यांची शाकीय वाढ तसेच पुनरुत्पादीय वाढ होतच नाही. त्यामुळे बिया, कंद पक्व होत नाहीत. परिणामतः नवीन रोपे तयार होण्याचे प्रमाण कमी होते. रानभाज्यांची तोडही मोठ्या प्रमाणात होते. शिवाय, या भाज्या रानात, डोंगरावर, शेतात, माळरानावर आपोआप उगवत असल्यामुळे त्यांच्या लागवडीसाठी विशेष प्रयत्न केले जात नाहीत.
माझ्या संशोधनानंतरच्या काळात 'ॲग्रोवन' या दैनिकात 'आरोग्यदायी रानभाज्या' या सदराखाली लेख लिहिण्याची संधी मला मिळाली. या लेखमालेला महाराष्ट्र तसेच इतर राज्यांतूनही उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला. अनेक लोकांनी मला फोन, मेसेज, ई-मेल करून माझे अभिनंदन केले, माझ्या लिखाणाचे कौतुक केले. काही शेतकऱ्यांनी या रानभाज्यांची शेती करण्यासाठीही सहमती दर्शवली आहे. अनेक तज्ज्ञांनी रानभाज्यांच्या अशा विशेष लिखाणासाठी तसेच पाककृतीसाठी कौतुक केले. अनेकांनी या रानभाज्यांची संग्रहित माहिती पुरवण्याबद्दलही विचारणा केली होती. त्यामुळे ही सगळी माहिती एकत्र करून ती पुस्तक स्वरूपात प्रकाशित करण्याची इच्छा मी 'ॲग्रोवन'कडे व्यक्त केली. त्यांनीही अगदी सहजपणे त्याला सहमती दर्शवली. या लेखमालेमुळे रानभाज्यांमध्ये खरंच रुची असणाऱ्या लोकांची ओळख झाली. त्यांनीही त्यांच्या भागात आढळणाऱ्या रानभाज्यांची, त्यांची शिजवण्याच्या पद्धतीची तसेच त्यामध्ये असणाऱ्या औषधी गुणधर्मांबद्दलची माहिती सांगितली. रानभाज्यांची पारख जुन्या पिढीच्या लोकांना होती आणि आहेच. मात्र विज्ञानाच्या कसोटीवर सगळ्या गोष्टी तपासून पाहणाऱ्या तरुण वर्गाला आणि शहरातील लोकांना या रानभाज्यांच्या औषधी गुणधर्मांनी आकर्षित करणे शक्य आहे.
रानभाज्या ओळखणे हे तसे कठीण काम. तसेच त्या बनवण्याच्या पद्धतीचेही विशेष ज्ञान नसल्यामुळे अनेक लोक सहसा या भाज्या आहारात घेण्यास टाळाटाळ करतात. काही भाज्या काही विशिष्ट पद्धतीने शिजवाव्या लागतात. काही भाज्यांमधील काही भाग काढून टाकावा लागतो. तसेच काही उकडून शिजवाव्या लागतात. शिवाय विशिष्ट वाढीच्याच भाज्या घ्याव्या लागतात. या सगळ्या शंकांचे निरसन करण्याच्या दृष्टीने सोप्या पद्धतीने ही सगळी माहिती संकलित करण्याची कल्पना डोक्यात घोळू लागली आणि त्यातूनच हे पुस्तक साकारले गेले.
या पुस्तकात दिलेल्या प्रत्येक वनस्पतीच्या सगळ्या भागांचे सखोल वर्णन करण्याचा विशेष प्रयत्न मी केला आहे. तसेच या भाज्या शिजवल्यानंतर कशा दिसतात हेही पुस्तकात दाखवलेले आहे. रानभाज्यांचे माहिती असलेले जास्तीत जास्त औषधी गुणधर्म देण्याचा प्रयत्न केलेला आहे. भाजीचा कोणता भाग उपयुक्त आहे, तो कसा वापरावा याची तपशीलवार माहिती दिलेली आहे. या रानभाज्या करण्याच्या स्थानिक लोकांच्या पद्धती अगदी सोप्या आहेत. मीठ, मिरची, कांदा, लसूण, फोडणीसाठीचे साहित्य अशा त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या साहित्यातूनच या पाककृती तयार केल्या जातात. आदिवासी लोक या रानभाज्या जशा करतात तीच मूळ स्वरूपातील कृती आणि त्यांचेच प्रमाण पुस्तकात दिलेले आहे.
रानभाज्यांच्या माहितीचे संकलित स्वरूपातील पुस्तक प्रकाशित करण्यास सहकार्य केल्याबद्दल मी 'ॲग्रोवन'चे संपादक अमित गद्रे, सकाळ प्रकाशनाच्या संपादिका ऐश्वर्या कुमठेकर आणि संपादनास सहकार्य केल्याबद्दल अपर्णा बोडस यांची मन:पूर्वक आभारी आहे. ही सगळी माहिती संकलित करण्यासाठी पालघर, नाशिक, अहमदनगर, पुणे येथील अनेक आदिवासी बांधव तसेच शेतकरी बांधव यांची खूप मदत झाली. 'बायफ' संस्थेचे संजय पाटील सर, डी. के. कुलकर्णी सर, योगेश नवले सर आणि प्रा. तुषार उगले यांचे विशेष सहकार्य लाभले. तसेच जव्हार व मोखाडा या आदिवासी भागातील कमल वहिनी व मावजी पवार दादा, वांगणपाडा, चौक, ब्राह्मणपाडा येथील बचत गटाच्या महिलांचे मोलाचे सहकार्य लाभले.
माझी आई आशालता चोथे व वडील अशोक चोथे यांच्या भक्कम पाठिंब्याशिवाय हे पुस्तक प्रत्यक्षात येणे शक्य नव्हते. त्यांचे आशीर्वाद असेच पाठीशी राहोत. या पुस्तकात दिलेल्या बऱ्याचशा पाककृती माझ्या आईने स्वतः करून दिल्या आहेत. पुस्तकातील पाककृतींची छायाचित्रे तिच्या मेहनतीविना काढणे अशक्य होते.
या पुस्तकातील माहितीमुळे शहरातील तसेच ग्रामीण भागातील लोकांना रानभाज्यांची नव्याने ओळख होईल, त्या पाककृती करून पाहण्यास प्रोत्साहन मिळेल अशी आशा आहे. या भाज्यांच्या संवर्धनासाठी अनेक उत्साही शेतकरी पुढे येतील व या अनमोल ठेव्याचे जतन करतील, अशी मला खात्री आहे. विद्यार्थी, निसर्गप्रेमी, अभ्यासक या साऱ्यांना ही माहिती उपयुक्त ठरेल अशी आशा करते. पुस्तक वाचल्यावर वाचकांनी त्यांचे अभिप्राय, सूचना मला अवश्य कळवाव्यात, ही विनंती.
प्रा. अश्विनी अशोक चोथे